छत्रपती संभाजीराजे… ‘एक राजा माणूस’ (भाग ३)

मराठा आरक्षण चळवळीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजेंना मानणारा तरुणांचा मोठा वर्ग तयार झालेला आहे. संभाजीराजे महाराष्ट्रातील तरुणांचे नेतृत्व म्हणून उदयास आले हे आपण मागील भागात पाहिले. मराठ्यांना मिळालेले आरक्षण न्यायालयाने स्थगित केल्यामुळे तो सध्या न्यायप्रविष्ट भाग आहे. आरक्षण परत मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. त्यामुळे आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई तूर्तास संपली होती. पण यानंतरही वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने संभाजीराजेंचे महाराष्ट्रभरात दौरे सुरुच राहिले. गडकोटांच्या संवर्धनासाठी संभाजीराजेंनी प्रयत्न सुरु केले. संभाजीराजेंच्या प्रयत्नांतून रायगडावर दरवर्षी पार पडत असलेल्या शिवराज्याभिषेक महोत्सवाने गर्दीचे उच्चांक मोडले. राजेंच्या मागे उभा असलेला जनतेचा मोठा वर्ग पाहता व राजेंचे सामाजिक कार्य पाहता राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधान मोदींच्या शिफारशीने संभाजीराजेंची राज्यसभेवर नियुक्ती केली. संभाजीराजेंच्या अचानक झालेल्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले. संभाजीराजेंच्या नियुक्तीचे समाजातून संमिश्र पडसाद उमटले. पण संभाजीराजेंच्या खासदारकीचे स्वागत करणाऱ्यांची संख्या अधिक होती. संभाजीराजेंनी आजपर्यंत चळवळीच्या माध्यमातून लढा दिला होता. पण चळवळी व आंदोलने करुन फारसे काही पदरात पडत नाही, आपले प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी हातात सत्ता हवी हे त्रिवार सत्य संभाजीराजेंना उमगले असावे आणि कदाचित यामुळेच संभाजीराजेंनी राज्यसभा सदस्यत्व स्वीकारले असे म्हणावयास वाव आहे. कारण राज्यसभा सदस्यत्व स्वीकारल्यानंतरची त्यांची कारकीर्द पाहता त्यांनी खासदारकीचा वापर केवळ महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत उपस्थित करण्यासाठीच केलेला दिसून येतो. ते खासदार झाल्यानंतर महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या पण कोणत्याही निवडणूकीत ते सक्रीय झाले नाहीत. संभाजीराजे भाजपाचा प्रचार करतील असा भल्याभल्यांचा अंदाज त्यांनी धुळीस मिळवला. त्यांनी निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचा प्रचारही केला नाही व कोणत्या उमेदवारास पाठींबाही दिला नाही. पक्षीय राजकारणापासून ते पूर्णतः अलिप्त राहिल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान संभाजीराजेंची खासदारकी एका वेगळ्याच कारणाने संपूर्ण महाराष्ट्रात अनेक दिवस चर्चेत राहिली. ते कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंच्या खासदारकीवर दिलेली प्रतिक्रिया. खासदार झाल्याबद्दल संभाजीराजेंचे अभिनंदन करण्यासाठी स्वतः पवारसाहेब कोल्हापूरच्या छत्रपतींच्या राजवाड्यात गेले. वाड्यावरही पवारांचा यथोचित पाहुणचार करण्यात आला. यावेळी पवारांना शाही मेजवानी देण्यात आली. वाड्यावरील पाहुणचार स्वीकारल्यानंतर कोल्हापूरात पवारांनी पत्रकार परिषद घेऊन राजेंच्या खासदारकीवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आणि राजेंच्या खासदारकीच्या चर्चा यानंतर महिनाभर वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल मिडीया आदी माध्यमांवर रंगू लागल्या.

पवारांच्या वक्तव्यामुळे संभाजीराजेंच्या खासदारकीचा राज्यभर गवगवा झाला. यापूर्वी एखाद्याच्या खासदारकीची एवढी चर्चा व प्रसिद्धी क्वचितच झाली असेल. विशेष म्हणजे पवारांनी वाड्यावरुन आल्यानंतर असे वक्तव्य केले होते त्यामुळे पवारांचे वक्तव्य हे “वाड्यावरचीच मसलत” असल्याचे कोल्हापूरात बोलले गेले. खरे खोटे स्वतः पवार व छत्रपतीच जाणोत !

राजे खासदार झाल्यानंतर काही दिवसांनी कोपर्डी येथे एक अमानुष घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ लाखोंच्या संख्येने मराठा समाज पुन्हा एकदा एकत्र आला. याचवेळी दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरु झाले. संभाजीराजे प्रथमच खासदार म्हणून संसद अधिवेशनास उपस्थित राहणार होते आणि या पहिल्याच अधिवेशनात कोपर्डीच्या घटनेविषयी संसदेत आवाज उठवून संभाजीराजेंनी आपल्या संसदीय कारकीर्दीस प्रारंभ केला. भाजपबरोबर जाऊन संभाजीराजेंनी मराठा समाजाचा विश्वासघात केला अशी टिकाही संभाजीराजेंवर झाली होती. पण मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत उपस्थित करणारे संभाजीराजे हेच पहिले खासदार आहेत हि बाब लक्षात घेतली पाहिजे.

‘खासदार’ म्हणून संभाजीराजेंच्या प्रगतीचा आलेख हा चढताच आहे. संभाजीराजेंची संसदेतील उपस्थिती हि सर्वाधिक म्हणजेच १००% इतकी आहे. संभाजीराजेंनी वेगवेगळ्या विषयावरील एकूण १६६ हून अधिक प्रश्न संसदेत उपस्थित केले आहेत. याशिवाय कोल्हापूरातील इतर दोन खासदारांच्या तुलनेत संभाजीराजेंनी दत्तक घेतलेल्या ‘येळवण जुगाई’ या गावाची प्रगती वेगाने होत आहे.

‘छत्रपती’ म्हणून संभाजीराजेंना कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वीपासूनच मान सन्मान होता. पण २००९ च्या पराभवानंतर राजे जिल्ह्याच्या राजकारणातून स्वतःच बाजूला झाले होते. त्यांचे बंधू माजी आमदार मालोजीराजे हेदेखील सक्रीय राजकारणातून पूर्णतः बाजूला होऊन पुण्यातील शिक्षणसंस्थांचा कारभार सांभाळत आहेत. मालोजीराजेंच्या पत्नी मधुरीमाराजे या कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे नेते माजी मंत्री स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांचा प्रचंड जनसंपर्क व जनमान्यता आहे. त्यांच्या रुपाने छत्रपती घराण्यातील आणखी एक चेहरा राजकारणात येणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या लोकसभा निवडणूकीत संभाजीराजेंनी रिंगणात उतरावे अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे. भविष्यात काय होईल हे येणारा काळच सांगेल. आतापर्यंतच्या तीन भागांमधून आपण संभाजीराजेंच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. संभाजीराजे हे राजघराण्याचे सदस्य आहेत, त्यातूनही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल सतत उत्सुकता असते. आपल्या राजेंचे दैनंदिन आयुष्य कसे असेल, राजेंचा स्वभाव कसा असेल इथंपासून ते राजघराण्याची संपत्ती किती असेल इथंपर्यंत जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल उत्सुकता असते. संभाजीराजेंबद्दल या बाबींचाही आपण आढावा घेणार आहोत, पण या लेखमालेच्या पुढील भागात…..

हि लेखमाला आपल्याला कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरु नका.

लेखमालेचे इतर भाग वाचण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ (भाग १)

छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ भाग दुसरा (मराठा आरक्षणाचा लढा)

छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ भाग २ (मराठा आरक्षण लढा)

२००९ च्या लोकसभा निवडणूकीत पराभवास सामोरे जावे लागल्यानंतरही खचून न जाता संभाजीराजे अधिक जोमाने काम करु लागले. याबद्दल बोलताना ते म्हणतात, “२००९ च्या पराभवानंतर माझ्यापुढे दोनच पर्याय होते. एकतर राजवाड्यात परतून ऐषोआरामाचे जीवन जगायचे किंवा जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न सोडवायचे. मी दुसरा पर्याय निवडला.” निवडणूक निकालानंतर काहीच दिवसांत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा होता. दरवर्षीप्रमाणे याही सोहळ्यास राजे उपस्थित राहिले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पराभवानंतर संभाजीराजे कोल्हापूरातून बाहेर पडले व मराठा आरक्षणाबद्दल जनजागृतीसाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.

पण संभाजीराजे थेट राज्यपातळीवर जाणे हि त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणातून शोधलेली पळवाट आहे, असे काही बड्या राजकीय तज्ञांनी विश्लेषण केले. पण खरं सांगायचं तर संभाजीराजे हे शिवाजी महाराजांचे वंशज असल्यामुळे त्यांनी केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित राहणे हेच अयोग्य ठरले असते. राजेशाही संपुष्टात येऊन भारताने लोकशाहीचा जरी अंगिकार केला असला तरी सातारा व कोल्हापूर या दोन राजघराण्यांप्रती महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असलेले नितांत प्रेम, आदर व अपेक्षा तिळमात्रही कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता विचार न करता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी संभाजीराजे पुढे सरसावले हे त्यांच्या घराण्याच्या वारशास शोभणारेच पाऊल होते.

काही वर्षांपूर्वी बहुतांश मराठा समाजात आरक्षणाबद्दल प्रतिकूल मानसिकता होती. आम्ही उच्चकुलीन, सरदार – सरंजामदार जातीवंत मराठे आणि आम्ही आरक्षण घेऊन स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घ्यायचे का ? आरक्षणाच्या कुबड्यांची आम्हाला गरज नाही, अशी नकारात्मक लोकभावना मराठा समाजात रुजलेली होती. पण यामुळे समाजातील गरीब घटकांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात होत असलेले अतोनात नुकसान, कुचंबणा याकडे कुणाचेही लक्ष नव्हते अथवा प्रतिष्ठेपायी याकडे दुर्लक्ष केले जायचे. ज्या संघटना आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देत होत्या त्यांच्यामध्येही एकी नव्हती. आरक्षणाच्या लढ्याला एकसंधपणा नव्हता. यावेळी संभाजीराजे छत्रपती या लढ्यात उतरले. मराठ्यांच्या सर्व संघटनांना त्यांनी एका छत्राखाली आणले. या संघटनांनी आरक्षण लढ्याचे नेतृत्व राजेंकडे सोपवले. संभाजीराजेंनी शिवशाहू रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात दौरे केले व ठिकठिकाणी सभा घेऊन आरक्षणाबद्दल मराठा समाजात जनजागृती केली.

संभाजीराजेंच्या प्रत्येक सभेस हजारो लोकांची गर्दी उसळायची. “पूर्वी आपण मोठे सरंजामदार, जमीनदार होतो. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आपापसांत वाटण्या होऊन आज शंभर एकराचे शंभर तुकडे झालेले आहेत. समाजावर आर्थिक दारिद्रय ओढवलेले आहे. गुणवत्ता असूनही आपल्या मुलांना हवे ते शिक्षण मिळत नाही. मराठ्यांनो, हि परिस्थिती बदलायची असेल तर रम्य भूतकाळ विसरा आणि ओबीसींमध्ये स्वतःची गणना करा. अभिमानास थोडा धक्का बसेल पण आपल्या गरीब बांधवांना शिक्षणात फायदा होईल,” असे स्पष्ट शब्दांत प्रत्येक सभेत संभाजीराजेंनी ठणकावून सांगितले.

शाहू महाराजांनी मराठ्यांना दिलेल्या आरक्षणामुळे कोल्हापूर संस्थानात मराठ्यांची सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात झालेली उन्नती समजावून देत आरक्षणाचे महत्व व आज मराठा समाजास असलेली आरक्षणाची गरज समाजाच्या मनावर बिंबवली.

शिवशाहू रथयात्रेदरम्यान संभाजीराजेंच्या वाहनांचा ताफा…

शिवशाहू रथयात्रेच्या माध्यमातून आरक्षणाबद्दल समाजाचे मतपरिवर्तन घडवून आणून संभाजीराजेंनी ४ एप्रिल २०१३ रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे एक लाख मराठ्यांचा मंत्रालयावर मोर्चा काढला. यामध्ये ८४ हून अधिक मराठा संघटना सामील झाल्या होत्या व या मोर्चाचे सामूहिक नेतृत्व संभाजीराजेंकडे देण्यात आले होते.

गेल्या दोन-अडीचशे वर्षांनंतर एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज एकदिलाने एकत्रित येण्याची हि पहिलीच वेळ होती, तेदेखील खुद्द छत्रपतींच्या नेतृत्वाखाली ! त्यामुळे “अशक्य ते शक्य कारण छत्रपतींचे नेतृत्व” असे या मोर्चाचे वर्णन सर्व स्तरांतून करण्यात आले.

मराठा समाजाची खरी ताकद व एकजूट दाखवून देण्यामध्ये संभाजीराजे यशस्वी झाले. या मोर्चामुळे राज्यसरकारला मराठा आरक्षणाविषयी गांभिर्याने विचार करणे भाग पडले व पुढच्याच वर्षी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६% आरक्षण जाहीर केले.

मराठा समाजाच्या लढ्याला यश आल्याचे दिसू लागले पण ते केवळ एक मृगजळ ठरले. न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात सत्तापालटही झाला. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार उदयास आले. यानंतर संभाजीराजेंच्या कारकीर्दीची दिशा काय राहिली हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत…

संभाजीराजेंच्या कारकिर्दीवरील या लेखमालेचा पहिला भाग वाचण्यासाठी पुढील लिंक ओपन करा छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ भाग पहिला

हा भाग आपणास कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. मराठा आरक्षण लढा – शिवशाहू रथयात्रेदरम्यानची आणखी काही क्षणचित्रे…

मुंबई येथील विशाल मराठा मोर्चाचे नेतृत्व करताना संभाजीराजे…