श्रीमंत छत्रपति शहाजी महाराज म्हणजे छत्रपति शिवरायांचे दहावे वंशज व कोल्हापूर राज्याचे अकरावे अभिषिक्त छत्रपति होते. दि. ३१ मार्च १९४७ रोजी महाराजांचा ‘छत्रपति’ म्हणून राज्याभिषेक झाला व महाराजांनी “क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर श्रीमन्महाराज शहाजी छत्रपति” हि बिरुदावली धारण केली. महाराज गादीवर आल्यानंतर महाराजांनी कोल्हापूर राज्यात लोकशाही शासनव्यवस्था व कायदेमंडळ स्थापन केले. मात्र हा काळ खूपच धामधुमीचा होता. स्वतंत्र भारत सरकार व छत्रपति घराण्याचे पारंपारिक विरोधक टोकाचे राजकारणी डावपेच खेळून कोल्हापूर राज्य स्वतंत्र भारतामध्ये विलीन करण्यासाठी छत्रपतिंवर प्रचंड दबाव निर्माण करीत होते. शहाजी महाराजांना छत्रपतिंच्या राज्याचे सौर्वभौमत्व गमवायचे नव्हते, म्हणून महाराणीसाहेबांना रीजंट नेमून स्वतः राजत्याग करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. पण महाराजांच्या या प्रयत्नांना यश आले नाही व दि. १ मार्च १९४९ रोजी महाराजांनी कोल्हापूर राज्य स्वतंत्र भारतात विलीन करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
हिज हायनेस मेजर जनरल क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज शहाजी छत्रपति हिंदूपद-पातशहा महाराज सरकार करवीर
सन १९१० साली सार्वभौम सर्वसत्ताधीश असणाऱ्या छत्रपति महाराजांच्या राजवाड्यामध्ये शहाजी महाराजांचा जन्म झाला होता. महाराजांनी आपले अर्धे आयुष्य एक सर्वसत्ताधीश “राजा” म्हणून व्यतीत केले होते व आता महाराजांच्या हाती सत्तेची कोणतीही सूत्रे असणार नव्हती. आपण छत्रपति असताना आपल्याला छत्रपतिंचे राज्य टिकविता आले नाही, याचे महाराजांना वाईट वाटत असे. यानंतर महाराजांनी सार्वजनिक जीवनातील आपला वावर कमी केला व ते आपले छंद जोपासू लागले. शिकार व इतिहास अध्ययन हे महाराजांचे अत्यंत आवडीचे विषय. महाराज हे इतिहासाचे पदवीधर होते. इतकेच नव्हे, तर विश्वविद्यापीठातून शैक्षणिक पदवी मिळविणारे ते भारतातील पहिलेच राजपुत्र होते. कोल्हापूर राज्याच्या विलीनीकरणानंतर महाराजांनी शिकार व वन्यप्राण्यांच्या जोपासनेमध्ये रस घेतला. जसे वय वाढले तसे शिकार बंद करुन महाराजांनी इतिहास अध्ययन व संशोधनात अधिक लक्ष घातले. दाजीपूरच्या विस्तृत व निबिड पसरलेल्या जंगलात डोंगरांच्या कुशीत अगदी मध्यभागी महाराजांचे आजोबा म्हणजेच राजर्षी शाहू छत्रपति महाराजांनी ‘शिकार कँप’ म्हणून एक दगडी दुमजली बंगला बांधला होता. “शिवाजी व्हिला” त्याचे नाव ! शाहू महाराज व राजाराम महाराज शिकारीसाठी व धरण बांधकामाच्या पाहणीसाठी जेव्हा राधानगरीस येत तेव्हा ते याच बंगल्यावर उतरत असत. शिकार केलेले वन्यप्राणी इथेच आणले जायचे. या बंगल्याच्या भोवतालचे घनदाट जंगल म्हणजे छत्रपतींच्या स्वतःच्या मालकीची वन्यपशुसंपदाच होती. या जंगलात व शिवाजी व्हिला बंगल्यामध्ये वाघ व बिबट्यांसारख्या हिंस्त्र श्वापदांचा मुक्त वावर असायचा. शहाजी महाराजांचे पाळीव वाघ व बिबटे याच ठिकाणी अगदी मुक्तपणे वावरायचे. मानवी कोलाहलापासून कित्येक कोस दूर असणाऱ्या व जणू निसर्गदेवतेने आपला खजिनाच दडविलेला आहे, अशा या शिवाजी व्हिलामध्ये शहाजी महाराजांनी इतिहास संशोधनाचे कार्य सुरु केले.
राजर्षि छत्रपति शाहू महाराजांनी राधानगरी येथे बांधलेला शिवाजी व्हिला. याच बंगल्यावर इतिहास संशोधनाचे कार्य वीस वर्षे अविरतपणे चालले.
प्रसिद्ध इतिहास संशोधक मा. वि. गुजर व छत्रपति शहाजी महाराज याठिकाणी इतिहास संशोधन करीत असत. पुढे महाराजांचे तरुणपणीचे मित्र व तत्कालीन जागतिक ख्यातीचे इतिहास संशोधक कर्नल मनोहर माळगांवकर यांनादेखील शहाजी महाराजांनी मराठ्यांचा इतिहासावर संशोधन करण्यासाठी उद्युक्त केले. छत्रपति घराण्याचे खासगी दफ्तर होते, त्यामध्ये अगणित ऐतिहासिक दस्तऐवज होते मात्र तरीही मिळतील तिथून मूळ दस्तऐवज मिळविण्यासाठी महाराजांनी पगारी कर्मचारी नियुक्त केले होते. हि मूळ कागदपत्रे जमा करुन त्यांची व्यवस्थित छाननी करायची व त्यांचे संपादन करुन ती कागदपत्रे प्रकाशित करायची, म्हणजे नंतर कुणीतरी या कागदपत्रांच्या आधारे नव्याने इतिहास लिहू शकेल. या कार्यात अजूनही तज्ञ लोकांची गरज आहे असे महाराजांना वाटत असे, त्यामुळे कर्नल माळगांवकरांना महाराजांनी एखादा योग्य अभ्यासक शोधण्याची आज्ञा केली. माळगांवकरांनी खूप शोध घेऊन सदाशिव मार्तंड गर्गे नामक एका इतिहास अभ्यासकाला आणून महाराजांपुढे उभे केले. गर्गे यांनी करवीर राज्याच्या इतिहास संशोधनात खूपच आघाडी घेतली, पण छत्रपति घराण्यात एकच नावाचे तीन चार छत्रपति असल्याने व कोल्हापूर राज्यात एकाच नावाची अनेक गावे असल्याने संदर्भ जोडण्यात अनेक अडचणी येत होत्या. या अडचणी सोडविण्यासाठी या विषयातील जाणकार, येथील लोककथा व भुगोलाचा चांगला अभ्यास असणारा कुणीतरी हवा होता. शं.ह. वर्टीकर हे वयाची ऐंशी ओलांडलेले एकमेव गृहस्थ हे काम करु शकतील, असं महाराजांचं ठाम मत होतं. वर्टीकर हे पूर्वी कापशी जहागिरीचे दिवाण होते. आपले उर्वरीत आयुष्य देवधर्म करण्यात अथवा चकाट्या पिटण्यात त्यांना अजिबात रस नव्हता. छत्रपतींच्या इतिहास मंडळात सामील होण्यात ते भलतेच उत्सुक होते. अफाट स्मरणशक्ती लाभलेले वर्टीकर म्हणजे कोल्हापूर राज्याचा चालता बोलता इतिहासच !
यानंतर महाराजांनी आपली गाडी पाठवून श्रीमंत खंडेराव गायकवाड व श्रीमंत रत्नाकरपंत राजाज्ञा या दोन जहागिरदारांना बोलावून घेतले. यांच्या कित्येक पिढ्यांनी शिवराय व ताराराणींच्या काळापासून छत्रपति घराण्याची सेवा केली होती. हे दोघेही मराठ्यांच्या इतिहासाचे जाणकार होते. अशा सहा इतिहास अभ्यासकांचे एक अनौपचारिक इतिहास मंडळच स्थापन झाले. पुढे महाराजांचे कारभारी व इतिहासप्रेमी यशवंतराव तस्ते हे ओघानेच या मंडळात सामील झाले.
शिवाजी व्हिला येथील छायाचित्र. डावीकडून श्रीमंत खंडेराव गायकवाड, शं. ह. वर्टीकर, स. मा. गर्गे, छत्रपती शहाजी महाराज, दिनकर केरकर, कर्नल मनोहर माळगांवकर, श्रीमंत रत्नाकरपंत राजाज्ञा व यशवंतराव तस्ते.
या मातब्बर इतिहास अभ्यासकांच्या एक दोन महिन्यांतून एकदा शिवाजी व्हिला येथे बैठका होऊ लागल्या. सात सदस्यांच्या या मंडळात बैठकांसाठी जनरल एस.पी.पी. थोरात, प्रसिद्ध चित्रपटनिर्माते भालजी पेंढारकर, राजपूत इतिहास संशोधक डॉ. रघुवीर सिंग, अमेरिकन विद्यापिठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. राव आणि इंग्लंडमधील विख्यात इतिहास संशोधक व मानववंशशास्त्रज्ञ डॉ. एड्रीन मेयर हेदेखील काही वेळेस येत असत.
बंगल्यातील एका खोलीत बैठकीचे कामकाज चालत असे. या खोलीत खुर्च्या अजिबात नव्हत्या. महाराज व सर्व मंडळी भारतीय बैठकीत सतरंजीवर बसायचे. समोर ऐतिहासिक व अस्सल कागदपत्रे, ग्रंथ वगैरे साधने ठेऊन त्यांवर चर्चा व्हायच्या. या चर्चांमधून नवनवीन इतिहास समोर येऊ लागला. कोणत्याही प्रकारचा व अगदी अनपेक्षित इतिहास जरी समोर आला, तरी महाराज तो स्वीकारत असत. यशवंतराव तस्ते या चर्चांचा सविस्तर अहवाल तयार करीत असत. या चर्चांमधून व तस्तेंनी तयार केलेल्या अहवालांमधून मराठ्यांच्या इतिहासाचे अनेक पैलू उघडले. इतिहास घडविलेल्या छत्रपतींच्या एका इतिहासप्रेमी वंशजाने स्थापन केलेल्या या इतिहास मंडळाने मराठ्यांच्या इतिहासावरील ऐतिहासिक कागदपत्रांचे एकूण तीस खंड संपादित केले व हे सगळेच्या सगळे महाराज छत्रपतिंनी स्वखर्चाने प्रकाशित केले. इतिहास लेखनास चालना मिळावी म्हणून या सर्व ग्रंथांच्या हजारो प्रती शहाजी महाराजांनी मोफत वाटल्या, तर काही प्रती ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर विकण्यात आल्या. महाराजांनी स्थापलेले हे इतिहास मंडळ तब्बल वीस वर्षे अखंड चालले. शेवटी महाराजांच्या मृत्यूनंतरच त्याचे कामकाज बंद झाले. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे राहिलेली संपत्ती चैनविलासात घालविणारे अनेक राजे तेव्हा होते, पण आपल्या पूर्वजांच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी, आपला दैदिप्यमान इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या हातातील संपत्तीचा विनियोग करणारा राजा हा छत्रपतींच्या कुळातील असावा, हा योगायोग निश्चितच नव्हता.
इतिहासप्रेमी माणसाला वाचनाची आवड नसेल तरच नवल ! महाराजांना इतिहास वाचनाची प्रचंड आवड होती. महाराजांच्या खासगी संग्रहात इतिहास, शिकार व युद्धकथा या विषयांवरील तेरा हजारहून अधिक ग्रंथ होते. दुर्मिळ ग्रंथ मिळेल त्या किंमतीत महाराज विकत घेत असत. जॉन फ्रियर याने लिहिलेल्या “न्यू अकाउंट अॉफ इस्ट अँड पर्शिया” या ग्रंथाची १६९२ साली प्रकाशित झालेली पहिली आवृत्ती मिळविण्यासाठी महाराजांनी खूप पैसा खर्च केला होता. याचे कारण म्हणजे या ग्रंथामध्ये १६७४ साली रायगडावर झालेल्या शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे प्रत्यक्ष सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांकडून लिहिलेले वर्णन होते. हा ग्रंथ मिळाल्यानंतर महाराजांनी आनंदोत्सव साजरा केला होता. महाराजांचे हे प्रयत्न सातत्याने चाळीस वर्षे अखंडपणे सुरु होते. छत्रपति शिवराय, शंभूछत्रपति, छत्रपति राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपति संभाजीराजे, महाराणी जिजाबाई यांनी लिहिलेली शेकडो ऐतिहासिक व अस्सल कागदपत्रे महाराजांनी मिळवून ती काचेच्या फ्रेममध्ये जतन करुन ठेवलेली आहेत.
महाराजांच्या झोपण्याच्या खोलीत नेहमी पाच सहा पुस्तके असायची. महाराज दररोज रात्री एक ते दोन वाजेपर्यंत पुस्तक वाचत बसायचे. काही वेळेस तर रात्रभर महाराज पुस्तकं वाचत बसायचे. प्रवासात नेहमी महाराजांसोबत इतिहास व शिकार या विषयांवरील पाच ते सहा पुस्तकं हमखास सोबत असायची. मराठ्यांच्या इतिहासातील हरएक बारकावे, तह, साल वगैरे सर्वकाही महाराजांना तोंडपाठ होते. महाराजांचे इतिहासप्रेम हे केवळ छत्रपति घराण्याच्या इतिहासापुरतेच मर्यादित नव्हते, तर स्वराज्याची सेवा करीत असताना ज्या घराण्यांतील वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा घराण्यांच्या इतिहासाची कागदपत्रे व त्यांच्या कैफीयती महाराजांनी स्वखर्चाने प्रकाशित करुन अनेक इतिहास अभ्यासकांना मोफत वाटल्या.
छत्रपती शहाजी महाराजांनी स्वखर्चाने इतिहासग्रंथ छापून ते अनेक इतिहास अभ्यासकांना मोफत दिले, जेणेकरुन या संदर्भग्रंथांच्या आधारावर अभ्यासक करवीर राज्याचा इतिहास सर्वांसमोर आणतील. महाराजांच्याच प्रेरणेने आम्हीही करवीर रियासत फेसबुक पेजच्या माध्यमातून सदर छायाचित्रात दिसणारे ग्रंथ तरुण इतिहास अभ्यासकांना मोफत वाटले, पण दुर्दैवाने आम्हालाही तोच अनुभव आला जो त्याकाळी महाराजांनाही आला होता आणि तो म्हणजे, जे अभ्यासक ग्रंथ घेऊन गेले ते तिकडेच गायब झाले. करवीर राज्याचा इतिहास मांडण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. चूक त्यांची नाही, चूक आमचीच ! इतिहासातून आम्ही काही शिकलो नाही याची खंत वाटते. असो !
इतिहासप्रेमाबरोबरच महाराजांनी आपले अनेक छंद जोपासले होते. प्राणीप्रेम, फुटबॉल, क्रिकेट, पोलो हे त्यांपैकीच काही. हातून सत्ता जरी गेली असली, तरी आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेऊन समाजकल्याणकारी कामांचा वारसाही महाराजांनी जपला होता, या सर्व विषयांवरही स्वतंत्र लेख नक्कीच लिहू. तूर्त इतकेच !
इतिहासाच्या उद्धारासाठी स्वतःस वाहून घेतलेल्या या इतिहासपुरुषांना मानाचा मुजरा…!
हा लेख आपल्याला कसा वाटला याबद्दल आपली प्रतिक्रिया जरुर नोंदवा.
पुढील लिंक ओपन करुन आमचे फेसबुक पेज लाईक करा. https://www.facebook.com/KarvirRiyasat